'एक फोन आणि जादू झाली', असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या फोनबद्दल भावुक होऊन पोस्ट केली आहे. आव्हाड यांची कोरोनाव्हायरसची चाचणी नुकतीच करण्यात आली.
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जवळ वावरणाऱ्या व्यक्तींपैकी काहींना Coronavirus ची लागण झाली आणि त्यानंतर आव्हाड यांचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं आहे, पण त्यावरून चर्चेला उधाण आलं होतं.
आव्हाड यांनी स्वतःला खबरदारी म्हणून होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती होती. या सगळ्याची चौकशी करायला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आव्हाडांना फोन केला आणि घरात राहूनच काम करण्याचा सल्ला दिला. पण या एका फोनने जादू केली, असं म्हणत आव्हाड यांनी यातून नवी ऊर्जा मिळाल्याचं सांगितलं आहे.
कॅबिनेट मंत्री आव्हाड यांनी याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आणि त्यात त्यांनी भावुकपणे हा प्रसंग सांगितला.
'अचानक साहेबांचा फोन आला. आवाजामध्ये एक माया, आपलेपणा, काळजी हे सगळ दिसत होत. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटल साहेब सगळ ठिक आहे. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. मी म्हटल नाही साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ. मग म्हटल साहेब ८० हजार खिचडी वाटपाच काय करायच. त्यावरती ते काहीच बोलले नाहीत. शांत पण अस्वस्थ
गरीबा बद्दल त्यांची तळमळ आम्ही ओळखुन आहोत
पण, साहेब तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आतातर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही.
तुमचेच संस्कार
लोकांसाठी लढायचे
एक फोन आणि जादू झाली
आशीर्वाद असावेत!' .. अशी पोस्ट आव्हाड यांनी लिहिली आहे.
आपली टेस्ट निगेटिव्ह आल्याचं आव्हाड यांनी स्वत: माध्यमांना स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर जितेंद्र आव्हाड करोना पॉझिटिव्ह होते, असा गौप्यस्फोट ठाणे मनपा राष्ट्रवादी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे.
'तीन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांचे करोना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पण तीन दिवसांत उपचार करून त्यांची दोन चाचण्या अवघ्या तीन दिवसांमध्ये निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड हे आता क्वारंटाईनमध्ये आहेत. आव्हाडांच्या व्हिडिओनंतर जनतेसमोर येण्याचं कारण म्हणजे, ते म्हणाले की, मी जनतेला जी रोज मदत करत आहे. ती करू शकत नाहीये. याची आम्हालाही खंत आहे.' असं मिलिंद पाटील म्हणाले होते.