आईचं झालं निधन, दु:ख पचवत लेकीनं Video Call वरून घेतलं अंत्यदर्शन

'आईच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही याची खंत आयुष्यभर राहील.'



औरंगाबाद (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमुळे सगळा देशच ठप्प झालाय. सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने वाहतूक बंद आहे. शेकडो लोक अडकून पडलेत. या काळात अनेकांची ताटातूट झाली. आपल्या जवळच्या माणसांच्या अंत्यसंस्कारालाही अनेकांना जाता आलं नाही. अनेक ठिकाणी माणसच नसल्याने व्यवस्था करण्यातही अडचणी येत आहेत. ज्या आईने लहानचं मोठं केलं, वाढवलं त्या आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्कारला जाता आलं नसल्याने एका लेकीन व्हिडीओ कॉलवरूनच आईचं शेवटचं दर्शन घेतलं.


औरंगाबादच्या उषा कांतिलाल गीते यांच्यावर हा प्रसंग ओढवला. उषा यांच्या मातोश्री शांताबाई यांचं वृद्धापकाळाने उल्हासनगर इथं निधन झालं. गेली काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उषा ताईंना आपल्या आईच्या भेटीसाठी जाण्याची इच्छा होती तर शांताबाईंना लेकीच्या भेटीची ओढ लागली होती.


परिस्थिती निवळली की आईच्या भेटीला जाण्याचं त्यांनी ठरवलंही होतं. मात्र जे होऊ नये असं वाटत होतं तेच घडलं. शांताबाई यांचं वयाच्या 84 व्या वर्षी शुक्रवारी निधन झालं. आईच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. त्यांना सर्वात जास्त दु:ख होतं ते आईचं शेवटचं दर्शनही झालं नाही याचं. शेवटी व्हिडीओ कॉलवरून त्यांनी आईचं शेवटचं दर्शन घेतलं. आईच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही याची खंत आयुष्यभर राहील असं मत त्यांनी व्यक्त केलं.