दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यातील पाण्याने दारू निर्मिती करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे तळीरामांनी आता गावठी दारुकडे मोर्चा वळवला आहे.
वर्धा (प्रतिनिधी): लॉकडाऊनमुळं दारू मिळणं कठीण झालयं. दारूसाठी तळीरामांची भटकंती होत आहे. अशा स्थितीत तळीरामांची तहान भागवण्यासाठी गावठी दारूची निर्मिती होत आहे. वर्ध्यात गावभर्याचं सांडपाणी वाहून आणणार्या नाल्यातील पाण्याचाच वापर करून दारू निर्मिती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. स्थानिक गुन्हे शाखेन ही कारवाई केली आहे. लॉकडाऊनमुळे दारुची दुकाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात दारुचा काळाबाजारही होत आहे. तर, काही ठिकाणी बेकादेशीर मार्गाने दारुचे उत्पादन केले जात आहे. अशा प्रकारच्या दारुतून अन्य आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वर्ध्याच्या मध्यभागातून सांडपाणी वाहून नेणारा हा नाला आहे. बुरड मोहल्ला आणि उद्यानाच्या मधोमध असलेल्या नाल्याच्या काठावर तोकड्या जागेत झोपडी तयार करून बाजूलाच गावठी दारू निर्मिती सुरू होती. झाडाझुडपांनी हा भाग व्यापला आहे. इथं काठावरच सडव्याकरीता जमिनीत ड्रम गाडले होते. दारू निर्मितीकरीता येथूनच वाहणार्या नाल्यातील पाण्याचा वापर केला जात होता. अवघ्या गावभराचं सांडपाणी या नाल्यात वाहून येतं. या पाण्याचा वापर असलेली दारू आरोग्यास हानीकारक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. लिसांनी मोहा सडवा, ड्रम, पाण्याच्या टाक्या आदी साडेपाच लाखांचं साहित्य नष्ट केलयं. सध्या दारू मिळवण्यासाठी अनेक जण धडपडताहेत. दारू गाळण्यासोबतच मिळवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. पण, दारूबंदी असलेल्या वर्ध्यातील हा दारू गाळण्याचा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे.