भारतातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 10,815 झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 353 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. आतापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ गेल्या 24 तासांत झाली आहे.
नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासांत COVID-19 चे 1211 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे भारतातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 10,815 झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 353 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. मागच्या 24 तासांत Coronavirus मुळे 29 मृत्यू झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1190 जणांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. ते बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या दिवसभरात 179 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरचा वाढता धोका लक्षात घेत देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा त्यांनी मंगळवारी सकाळी केली. पण त्याचबरोबर देशात ज्या भागात कोरोनाचा धोका तुलनेनं कमी झाला आहे आणि जिथे नवे रुग्ण सापडलेले नाहीत, तिथले व्यवहा 20 एप्रिलला सुरू करण्याविषयी सूतोवाचही पंतप्रधानांनी त्यांच्या संदेशात केलं.
यासंदर्भात माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, 20 एप्रिलपर्यंत देशातला प्रत्येक जिल्हा आणि शहर या दृष्टीने तपासलं जाईल. जिल्हा प्रशासन आणि शहर प्रशासन आपापल्या भागात कोरोनाची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी काय प्रयत्न केला, हे लक्षात घेऊन त्यांना लॉकडाऊनमधून सवलत द्यायचा निर्णय घेण्यात येईल.
या लिटमस टेस्टच्या आधारेच टाळेबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन अंशतः हटवण्यासाठी काय नियमावली किंवा कुठले निकष लावले जातील यासंदर्भातला तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, असं आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं.