अशा अड्ड्यावर कोणी पत्ते पिसत असेल तर पिसावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच : संजय राऊत

महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत: मुख्यमंत्री होते. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना माहित आहे, अशा प्रसंगी कसं काम करायला हवं. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.



मुंबई (प्रतिनिधी): "कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे. ही देशाची लढाई आहे, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसंच "विरोधी पक्षाला वाटत असेल की असं राजकारण करुन सत्तेच्या पिंडाला कावळा शिवेल, पण आता लॉकडाऊनमध्ये कावळेही नाहीत. अशा अड्ड्यावर बसून जर कोण पत्ते पिसत असेल तर पिसावेत," अशी टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. संजय राऊत यांनी या संदर्भात ट्वीट करुन राज्यपालांवर टीका केली होती. "राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!," असं ट्वीट करत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. यानंतर विरोधकही राज्यपालांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहेत.


'राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठाम उभं राहावं'
संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजभवनात राज्यपाल अधिकाऱ्यांना परस्पर बोलून यंत्रणा राबवतात. मुख्यमंत्र्यांचे आदेश वेगळे असू शकतात, राज्यपालांचे आदेश वेगळे असू शकतात. त्यामुळे ही कोरोनोसंदर्भात एक गोंधळ निर्माण होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आम्ही नक्कीच बोलणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची मुदत 27 मे रोजी संपणार आहे. याबाबत अनेक बातम्या, समज, गैरसमज पसरत आहे. यामुळे प्रशासनामध्ये, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे थांबवण्याचं काम राजभवनाचं आहे. या गोंधळाचा केंद्रबिंदू राजभवन आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत: मुख्यमंत्री  होते. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना माहित आहे, अशा प्रसंगी कसं काम करायला हवं. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे."