बीसीसीआय देखील या लढ्यात सहभागी झाली असून पंतप्रधान मदतनिधीला 51 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला
मुंबई (प्रतिनिधी): कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था, कलाकार, राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करत आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींही याला हातभार लावत आहेत. बीसीसीआय देखील या लढ्यात सहभागी झाली असून पंतप्रधान मदतनिधीला 51 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला. कोरोनाविरोधातील लढ्यात देशातील आपत्कालीन सुविधेला अधिक बळ मिळावे असे बीसीसीआयने परिपत्रक काढून जाहीर केलं आहे.
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. तर, या काळात कोणी उपाशी राहु नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे
सौरव गांगुली 50 लाख रुपयांचे तांदूळ देणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक जण विशेषत: हातावर पोट असलेले मजूर अडचणींचा सामना करत आहे. या लोकांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुली समोर आला आहे. सौरव गांगुली गोरगरिबांना मोफत तांदूळ वाटणार आहे. यासाठी तो 50 लाख रुपये खर्च करणार आहे.